नवी दिल्ली : एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमारनजीक एक मोठी घटना घडली. या भागात पीपल्स लिबरेशन आर्मी या स्थानिक गटातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफलच्या ३ जवानांना वीरमरण आले आहे. तर, चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांनी या भागात सर्वप्रथम आयईडीने स्फोट घडवून आणला. ज्यानंतर त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. इंफाळपासून १०० किमी अंतरावर असलेल्या या भागात तातडीने सैन्याची जादा कुमक पाठवण्यात आली.


सैन्याकडून या भागामध्ये फुटीरतावादी गटातील काहीजणांचा शोध घेण्याचं काम सुरु होतं. ज्यानंतर या भागात चौकशीची सत्रही वाढवण्यात आली आहेत. मागील वर्षी चंदेलमध्येच आसाम रायफल्सच्या तळावर फुटीरतावाद्यांनी हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर त्यांनी जवळील डोंगराळ भागात पळ काढला होता. सुदैवानं यात सैन्यातील कोणाही जवानाला इजा पोहोचली नव्हती.